चंद्रपूर :- महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून, स्वतः खर्च करून आणि प्रचारात सक्रिय भूमिका बजावून निवडून आणलेल्या काही उमेदवारांच्या भूमिकेवर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. दिलीप कांबळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीनंतर सुरू असलेल्या कथित ‘मिठाईच्या राजकारणा’वर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, संबंधित नगरसेवकांनी जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी आज आयोजित पत्रपरिषदेत केली आहे. राजुरा हत्याकांडातील 5 आरोपींवर मोक्का……
डॉ. कांबळे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख केला आहे. फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवर निष्ठा ठेवून काम करत असल्याचे सांगताना त्यांनी यापूर्वी बामसेफ / बीएसपी BAMCEF/BSP तसेच काँग्रेसमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्याचे नमूद केले आहे.
मागील काही वर्षांपासून चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर आणि माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पाच उमेदवारांना उमेदवारी मिळवून दिल्याचा दावा
बौद्ध समाजात राजकीय नेतृत्व निर्माण व्हावे, निवडणुकीत विजय मिळविण्याचा आत्मविश्वास वाढावा आणि काँग्रेस पक्षाची राजकीय ताकद वाढावी, या उद्देशाने आपण पक्षातील आपली प्रतिष्ठा पणाला लावून महानगरपालिका निवडणुकीत पाच उमेदवारांना उमेदवारी मिळवून दिली, असा दावा डॉ. कांबळे यांनी केला आहे.
विनोद लाभणे, महानंद वाळके, आकाश मानकर या उमेदवारांसाठी आपण प्रयत्न केले तसेच निवडणुकीत स्वतः खर्च करून त्यांना विजयी करण्यासाठी काम केले, असे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. या पाच विजयी उमेदवारांमध्ये एक आदिवासी आणि चार अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
‘मिठाई घेऊन भूमिका बदलण्याचा प्रकार’
निवडणुकीनंतर काही नगरसेवकांकडून कथितपणे एका गटाकडून दुसऱ्या गटाकडे जाण्याची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप डॉ. कांबळे यांनी केला आहे. “आज इकडून मिठाई, उद्या तिकडून मिठाई आणि पुन्हा पहिल्या बाजूने मिठाई आली की भूमिका बदलणे,” अशा शब्दांत त्यांनी या प्रकारावर टीका केली आहे.
या कथित घोडेबाजारीच्या राजकारणात आदिवासी आणि ख्रिश्चन अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार तटस्थ भूमिका घेत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, बौद्ध समाजातील तीन उमेदवारांच्या भूमिकेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
‘संपूर्ण समाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये’
काही व्यक्तींच्या राजकीय भूमिकेमुळे संपूर्ण बौद्ध समाजाच्या राजकीय प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे योग्य नाही, असेही डॉ. कांबळे यांनी पत्रकातून सूचित केले आहे. आपणच संबंधित उमेदवारांना तिकीट मिळवून दिले, आर्थिक मदत केली, प्रचार केला आणि समाजातील नागरिकांकडे त्यांच्या विजयासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे त्यांच्या सध्याच्या भूमिकेमुळे आपल्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“ज्या माणसाने आपल्याला निवडून आणले, जागा मिळवून दिली आणि त्यासाठी आर्थिक व राजकीय ताकद लावली, त्यांचे राजकीय करिअर घडले; मात्र ते सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी किती काम करतील?” असा सवाल जनतेने संबंधित नगरसेवकांना विचारावा, असे आवाहन डॉ. कांबळे यांनी केले आहे.