New Rewa-Hyderabad (Cherlapally) train to run via Ballarshah
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात बहुसंख्येने असलेल्या तेलुगू भाषिक व अन्य प्रवाशांच्या सुविधेकरिता नवी रेल्वेगाडी व्हाया बल्लारशाह मार्गे चालविण्यात यावी यासाठी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर सातत्याने प्रयत्नशील होते. या संदर्भात त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची अनेकदा भेट घेऊन सदर रेल्वेगाडी सुरू करण्याचा आग्रह धरला होता. रेल्वेमंत्र्यांनी रीवा, हैद्राबाद तसेच अन्य शहरांना जोडणाऱ्या रीवा-चर्लपल्ली एक्सप्रेस या नव्या रेल्वेगाडीस मंजूरी प्रदान केली आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी तेलुगू भाषिक बांधव तसेच हैद्राबाद व अन्य शहराकरिता प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत असलेल्या मानसिक त्रासाची दखल घेऊन व हंसराज अहीर यांच्या आग्रही भुमिकेचा सन्मान ठेऊन रेल्वेमंत्र्यांनी रीवा ते हैद्राबाद (चर्लपल्ली) व्हाया बल्लारशाह या नव्या गाडीस सुरू करण्यास स्वीकृती दिली आहे. या नव्या गाडीमुळे चंद्रपूर, बल्लारशाह व जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये वास्तव्यास असलेल्या तेलुगू भाषिक बांधवांना त्यांच्या गृहनगरात जाण्याकरिता फार मोठी सोय झाली असून या उपलब्धीबद्दल जिल्ह्यातील प्रवासी विशेषतः तेलुगू भाषिकांनी हंसराज अहीर यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला आहे.
ट्रेन नं. 20158/20157 रीवा-हैद्राबाद (चर्लपल्ली) व्हाया बल्लारशाह या नव्या रेल्वेगाडीला मंजूरी प्रदान करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्राद्वारे (पत्र क्र. 2026/सीएचजी/16/डब्ल्युसीआर/41, दि. 04 जून 2026) हंसराज अहीर यांना कळविले आहे.
रीवा-चर्लपल्ली या नव्या रेल्वेगाडीस स्वीकृती दिल्याबद्दल हंसराज अहीर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे विशेष आभार मानले आहे.