*बालकामगारांना कामावर ठेवणे दंडनीय गुन्हा*
*12 जून जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिन*
चंद्रपूर :- भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण व आरोग्य हे बालकांचे मूलभूत अधिकार आहेत. या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी समाजातील बालमजुरीची प्रथा समूळ नष्ट होणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयानेही 14 वर्षाखालील बालकांकडून काम करून घेणे, हा गंभीर गुन्हा मानले असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेच्या तरतुदी आहेत. Child labor is a punishable offense
केंद्र शासनामार्फत पारित करण्यात आलेल्या “बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 1986” नुसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसाय किंवा प्रक्रियेत कामावर ठेवणे तसेच 14 वर्षे पूर्ण पण 18 वर्षे न पूर्ण झालेल्या किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योगात कामावर ठेवणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे.
अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी संबंधित नियोक्त्याला 6 महिने ते 6 वर्षांपर्यंत कारावास आणि 20 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व दुकानदार, उद्योजक, आस्थापनाधारक, बांधकाम नियोक्ते, विटभट्टी व अन्य संबंधित मालकांनी कोणत्याही बाल अथवा किशोरवयीन कामगारास कामावर ठेवू नये.
बालमजुरी हे केवळ एक कायदेशीर उल्लंघन नाही तर ती सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक समस्यांना जन्म देणारी एक गंभीर अनिष्ठ प्रथा आहे. World Day Against Child Labor
त्यामुळे 12 जून रोजी “जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिन” म्हणून साजरा करताना सर्व नागरिकांनी या सामाजिक प्रश्नासंदर्भात जागरूक राहणे व बालकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.
कोणत्याही ठिकाणी बाल अथवा किशोरवयीन कामगार आढळून आल्यास संबंधितांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.