Friday, August 14, 2026
HomeCulturalप्रवासवर्णन - कान्हेरीच्या कुशीतला एक अविस्मरणीय दिवस

प्रवासवर्णन – कान्हेरीच्या कुशीतला एक अविस्मरणीय दिवस

इतिहासाच्या पाऊलखुणा, निसर्गाची हिरवाई आणि मैत्रीच्या आठवणींचा एक अद्भुत प्रवास “काही प्रवास अंतर कापतात, काही प्रवास मन कापतात; तर काही प्रवास आपल्याला इतिहासाच्या पाऊलखुणांशी जोडून जातात.”
मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यातून काही काळ बाहेर पडून इतिहास, निसर्ग, वास्तुकला, बौद्ध संस्कृती आणि सहप्रवासातील माणुसकी यांचा अनुभव घेण्याची संधी या दिवशी मिळाली. निमित्त होते कान्हेरी लेण्यांच्या स्टडी टूरचे. पाली रिसर्च इन्स्टिट्यूट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आणि माननीय अरविंद भंडारे सर, स्वप्निल तांबे सर आणि ढवळे सर यांच्या मार्गदर्शन व व्यवस्थापनातून या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण स्टडी टूरचे मुख्य मार्गदर्शक म्हणून अरविंद भंडारे सरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे अशा विविध जिल्ह्यांतून अनेक सदस्य या उपक्रमात सहभागी झाले होते. वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेली माणसं एका धाग्यात जोडली गेली होती. इतिहास समजून घेण्याची आणि निसर्ग अनुभवण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. Travelogue

शहर मागे पडले आणि जंगल पुढे आले:
सकाळी साडेआठ वाजता बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारावर सर्वांनी एकत्र जमायचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे जवळपास सर्व सदस्य वेळेत पोहोचले. भेट झाली, ओळखी वाढल्या, गप्पांना सुरुवात झाली आणि सर्वांचा चहा-नाश्ता झाला. प्रवेशाची तिकिटे काढल्यानंतर बसच्या प्रतीक्षेसाठी सर्वजण रांगेत उभे राहिलो. एक-दोन बस पुढे गेल्या आणि अखेर आमची बस आली. महाराष्ट्र शासनाची एसी बस. आरामदायी आसने आणि गारवा. बस सुरू झाली आणि आमचा कान्हेरीकडे जाणारा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला मुंबईचे परिचित दृश्य दिसत होते. पण बस जसजशी पुढे सरकत गेली तसतसे शहर मागे पडत गेले आणि निसर्ग जवळ येऊ लागला. आम्ही बहुतांश मुंबईकर. सोमवार ते शनिवार घर, ऑफिस आणि पुन्हा घर, एवढाच जणू आमच्या जीवनाचा आखलेला मार्ग. शहरातील धावपळ, वाहतूक, कामाचा ताण आणि रोजच्या जबाबदाऱ्या यात निसर्गाशी असलेला आपला संवाद कुठेतरी हरवत चालला आहे. त्यामुळेच कदाचित या स्टडी टूरला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असावा. बसच्या खिडकीतून बाहेर पाहताना मनात एक वेगळीच प्रसन्नता निर्माण होत होती. हिरवी झाडे, झुडपे, जंगल, डोंगर आणि नागमोडी वळणांचा रस्ता…
आणि अचानक एका आदिवासी पाड्याच्या जवळ काही हरणे उघड्यावर खेळताना दिसली. क्षणभर सगळ्यांचे लक्ष बसच्या खिडक्यांकडे गेले. कॅमेरे बाहेर आले. डोळे विस्फारले. आणि मनाने त्या दृश्याला अलगद आपल्या आठवणींच्या कप्प्यात साठवून ठेवले. An Unforgettable Day in the Lap of Kanheri:

खळखळणारी नदी आणि हिरव्या जंगलाचा सहवास
काही आदिवासी पाडे मागे पडले आणि पुढे एक नदी दिसली. तिचे पाणी खळखळत वाहत होते. त्या पाण्याचा नाद, आजूबाजूचे जंगल आणि शांत वातावरण मनाला विलक्षण समाधान देत होते. जंगलातील कितीतरी प्राणी-पक्षी या नैसर्गिक जलस्रोताचा उपयोग करत असतील, असा विचार मनात आला. थोडे पुढे गेल्यावर एक छोटेसे धरण दिसले. पावसाळ्यामुळे ते पाण्याने भरून गेले होते. वातावरणात गारवा होता. अधूनमधून पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती. समोर डोंगर… आजूबाजूला हिरवाई… नागमोडी रस्ता… आणि वर निरभ्र आकाश… निसर्गाने जणू आपल्यासाठी एक भव्य चित्रच तयार केले होते. बस पुढे जात होती आणि मन मात्र प्रत्येक दृश्यावर थांबत होते. “आता पुढे काय दिसणार?” ही उत्सुकता सतत मनात होती.

पायी प्रवासाची अनपेक्षित भेट
काही कारणास्तव आमची बस शेवटच्या स्थानकापर्यंत न जाता अर्ध्या वाटेतच थांबली. सर्व प्रवाशांना तेथे उतरावे लागले. आता पुढचा प्रवास पायी करायचा होता. सुरुवातीला हा बदल अनपेक्षित वाटला; पण काही पावले चालताच त्याचा आनंद जाणवू लागला. निसर्गाच्या सानिध्यातून चालताना प्रत्येक झाड, प्रत्येक पान, प्रत्येक दगड आणि प्रत्येक पायवाट आपल्याशी काहीतरी बोलत असल्यासारखी वाटत होती. आणि काही वेळातच आमच्या डोळ्यांसमोर इतिहासाची भव्य दारे उघडली— कान्हेरी लेणी!

दगडात कोरलेले ज्ञानाचे विद्यापीठ – 
कान्हेरी लेणी दिसताच पहिली भावना होती आश्चर्याची
इतक्या मोठ्या प्रमाणात खडकात कोरलेली वास्तू, त्यातील शिल्पे, स्तंभ, गुहा, रचना आणि प्राचीन वास्तुकलेचे दर्शन मन थक्क करून सोडणारे होते. प्रवेश केल्यापासूनच अरविंद भंडारे सरांचे मार्गदर्शन सुरू झाले. प्रत्येक लेणीमागील इतिहास, वास्तुरचना, धार्मिक संदर्भ आणि सांस्कृतिक महत्त्व ते अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने समजावून सांगत होते. सदस्यांच्या मनात प्रश्नांची जणू मालिकाच सुरू झाली.
लेणी म्हणजे काय?
ती कोणी निर्माण केली?
कोणत्या काळात निर्माण झाली?
त्यासाठी एवढा कठीण खडक कसा कोरला गेला?
त्या काळात कोणती साधने वापरली जात होती?
या लेण्यांचा उपयोग कशासाठी होत होता?
लेणींचे प्रकार किती आहेत?
येथील शिल्पे कोणी घडवली?
त्यांच्या मागे कोणती कलादृष्टी होती?
या प्राचीन वास्तूंचे संवर्धन कोण करत आहे?
प्रश्न अनेक होते आणि भंडारे सरांकडे प्रत्येक प्रश्नाला अभ्यासपूर्ण उत्तर होते. आज आपण कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक, अत्याधुनिक यंत्रे आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने वास्तू उभारत आहोत. मात्र त्या काळी अशी कोणतीही साधने नव्हती. तरीही कलाकारांनी दगडात कोरलेल्या या कलाकृतींची अचूकता आणि सौंदर्य पाहिल्यावर मनात एकच प्रश्न निर्माण होतो. “त्या काळातील माणसाच्या हातात किती सामर्थ्य आणि मनात किती कल्पनाशक्ती असेल?” कान्हेरी या प्रश्नाचे उत्तर आजही आपल्या डोळ्यांसमोर उभे करते.

इतिहास, धर्म आणि संस्कृतीचा संगम
कान्हेरी हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या आणि महत्त्वपूर्ण लेणीसमूहांपैकी एक आहे. बौद्ध धर्माच्या विविध परंपरांचा प्रभाव येथे दिसून येतो. थेरवाद, महायान आणि वज्रयान या परंपरांशी संबंधित शिल्प, वास्तू आणि अवशेष या परिसराच्या ऐतिहासिक महत्त्वाची साक्ष देतात. महाराष्ट्रातील लेणीपरंपरेचा विकास सातवाहन काळापासून पुढे विविध राजघराण्यांच्या काळात होत गेला. सह्याद्रीच्या बेसाल्ट खडकात कोरलेल्या या लेण्यांनी तत्कालीन धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक जीवनाची महत्त्वपूर्ण माहिती आजपर्यंत जपून ठेवली आहे. अजिंठ्याची ओळख भित्तीचित्रांमुळे आहे; तर कान्हेरीची ओळख तिच्या विस्तीर्ण लेणीसमूहामुळे, शिल्पकलेमुळे, शिलालेखांमुळे, स्तंभांमुळे आणि विविध बौद्ध परंपरांच्या ठशांमुळे आहे. कान्हेरी म्हणजे जणू दगडात कोरलेले एक प्राचीन विद्यापीठच.

प्रत्येक लेणीची एक वेगळी कथा
जसजसे आम्ही वर चढत होतो, तसतशा वेगवेगळ्या आकाराच्या आणि रचनेच्या लेणी आमच्यासमोर येत होत्या. एका लेणीत कोरीव नक्षीकाम होते. दुसरीकडे शिलालेख होते. कुठे भव्य स्तंभ होते. कुठे बुद्धमूर्ती होत्या. कुठे वास्तुरचनेचे वेगळेपण जाणवत होते. प्रत्येक दगड वेगळा. प्रत्येक रचना वेगळी. प्रत्येक शिल्प वेगळे. आणि प्रत्येकामागे एक इतिहास. त्या शिल्पांकडे पाहताना एक विचार मनात आला. आजच्या काळात आपण कृत्रिम बुद्धिमत्तेला “AI” म्हणतो; पण त्या काळातील कलाकारांची सर्जनशील बुद्धिमत्ता कोणत्या पातळीची असेल ? त्यांच्याकडे संगणक नव्हता, डिजिटल मोजमाप नव्हते, अत्याधुनिक यंत्रसामग्री नव्हती. होते ते फक्त हातातील कौशल्य, डोक्यातील कल्पकता आणि मनातील कलाभक्ती. आणि त्यातून निर्माण झाला हा अमूल्य वारसा.

डोंगरावरून दिसलेली मुंबई
दुपारचे साडेबारा वाजले होते. सूर्य माथ्यावर आला होता. उष्णता जाणवत होती; पण डोंगरमाथ्यावर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे त्या उष्णतेचा त्रास तुलनेने कमी जाणवत होता. जसजसे आम्ही वर जात होतो, तसतसे खालील दृश्य अधिक सुंदर होत होते. खाली पसरलेली घनदाट हिरवाई… दूरवर दिसणाऱ्या मुंबईच्या इमारती… आणि त्यामागे धुरकट होत जाणारे शहर… बोरीवलीच्या पश्चिमेकडील पॅगोडाचे दृश्यही वरून स्पष्ट दिसत होते. एका बाजूला हजारो वर्षांचा इतिहास आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक मुंबई! भूतकाळ आणि वर्तमानकाळ एका नजरेसमोर उभे होते. क्षणभर मनात आले मुंबईला आपण नेहमी रस्त्यांवरून, रेल्वेतून किंवा उंच इमारतींच्या मधून पाहतो; पण आज आम्ही मुंबईला इतिहासाच्या उंचीवरून पाहत होतो. तो अनुभव खरोखरच विलक्षण होता.

चहाच्या घोटात जुळलेली मने
प्रवासात थोडी विश्रांती घेत असताना चहा-पाण्याचा कार्यक्रम झाला. प्रत्येक सदस्याने आपल्या घरून सुका खाऊ आणला होता. सगळ्यांनी आपापला खाऊ एकत्र केला आणि एकमेकांसोबत वाटून खाल्ला. स्वप्निल तांबे सरांनी घरून तब्बल तीन थर्मास चहा आणि गुलाबजामची बरणी आणली होती. त्यांनी सर्व सदस्यांना प्रेमाने चहा आणि गुलाबजाम वाटले. त्या क्षणी जाणवले. ही केवळ स्टडी टूर नव्हती. ही एक सहल होती. ही एक गेट-टुगेदर होती. हे वनभोजन होते. हे ट्रेकिंग होते. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हा माणसांना माणसांशी जोडणारा प्रवास होता. काही तासांसाठी का होईना, पण घर-ऑफिसच्या चौकटीतून बाहेर पडलेली माणसं एका कुटुंबासारखी वागत होती.

घसरडा रस्ता आणि सावधगिरीचा धडा
पुढे जाताना एका ठिकाणी रस्ता अत्यंत घसरडा झाला होता. पावसामुळे शेवाळ साचले होते. प्रत्येक पाऊल सावधपणे टाकावे लागत होते. आमच्यातील एका ज्येष्ठ सदस्याचा पाय अचानक घसरला आणि ते खाली पडले. काही सदस्यांनी तत्काळ त्यांना सावरले. सुदैवाने मोठी दुखापत झाली नाही; मात्र हाताला किरकोळ खरचटले. त्या प्रसंगाने एक गोष्ट शिकवली. निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, तर त्याचा आदरही करावा लागतो. सौंदर्याच्या मागे धावताना सावधगिरी विसरून चालत नाही.

निर्वाणभूमी प्रवासाचा थरारक शेवट
आता आमच्या प्रवासाचा सर्वांत रोमांचकारी टप्पा समोर होता निर्वाणभूमी. कान्हेरीच्या शेवटच्या टोकाला असलेल्या या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग अत्यंत कठीण होता. अरुंद पायवाट, घसरडा रस्ता, एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर. काही वेळ आम्ही थांबलो. मनात विचार सुरू झाला “आता पुढे जावे की परत फिरावे?” दहा-पंधरा मिनिटे आम्ही विचार केला. मात्र अरविंद भंडारे सरांनी सर्वांना धीर दिला आणि पुढे जाण्याचा निर्णय घेतला. काही सदस्यांनीही होकार दिला. आम्ही सावधपणे पावले टाकत पुढे निघालो. कठीण वाट पार करत अखेर आम्ही निर्वाणभूमीपर्यंत पोहोचलो. तेथील वातावरण गंभीर, शांत आणि गूढ होते. आजूबाजूला प्राचीन स्तंभ, समोर खोल दरी आणि सभोवती जंगल आणि मग मिळाली आणखी एक रोमांचकारी जाणीव. या परिसरात बिबट्यांचा वावर असतो. काही वेळापूर्वीच बिबट्या त्या भागातून गेला असल्याचे त्याच्या पायांच्या ठशांवरून जाणवत होते. मातीत उमटलेले ते ठसे अगदी स्पष्ट होते. क्षणभर अंगावर काटा आला.
इतक्या जवळ वन्यजीवाचा वावर असल्याची जाणीव एकीकडे थरारक होती, तर दुसरीकडे आपली सावधगिरी किती आवश्यक आहे याची जाणीव करून देणारी होती. निर्वाणभूमीच्या बाजूलाच दरी असल्याने तेथे अत्यंत काळजीपूर्वक वावरावे लागत होते. पण एवढ्या अडचणी पार करून त्या ठिकाणी पोहोचल्याचे समाधान वेगळेच होते.

कान्हेरीला फक्त पाहू नका समजून घ्या
कान्हेरीसारख्या ऐतिहासिक स्थळांना आपण केवळ पर्यटनस्थळ म्हणून पाहिले तर त्या स्थळाच्या खऱ्या अर्थाचा मोठा भाग आपल्या हातातून निसटतो. ही स्थळे म्हणजे आपल्या इतिहासाची जिवंत पाने आहेत. मात्र वाढती गर्दी, हुल्लडबाजी, असावधानता आणि ऐतिहासिक वास्तूंबाबतची अनास्था यामुळे या वारशाच्या संवर्धनाचा प्रश्न गंभीर होत आहे. ऐतिहासिक शिल्पांना हात लावणे, त्यावर नावे लिहिणे, कोरीव कामाला धक्का पोहोचवणे किंवा परिसरात अस्वच्छता करणे या छोट्या वाटणाऱ्या कृती भविष्यात मोठे नुकसान करू शकतात. प्रशासनाने पुरेसे मार्गदर्शन, माहितीफलक, सुरक्षा आणि संवर्धनाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पर्यटकांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. इतिहास हा आपला मालकी हक्क नाही; तो पुढच्या पिढीची ठेव आहे. म्हणूनच कान्हेरीला भेट द्या, कान्हेरीचा इतिहास जाणून घ्या, कान्हेरीची शिल्पे जपा, आणि इतरांनाही हा वारसा जपण्यासाठी प्रेरित करा.

परतीचा प्रवास पाय थकले, मन मात्र भरून आले
निर्वाणभूमीचा अनुभव घेतल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. दिवसभर चालल्यामुळे पाय थकले होते. शरीराला विश्रांतीची गरज होती. पण मन मात्र आनंदाने भरून गेले होते. शेवटी उपाहारगृहात पोहोचलो. सर्वांनी एकत्र भोजन केले. भोजनानंतर बसने पुन्हा बोरिवलीच्या नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वाराकडे प्रस्थान केले. सकाळी ज्या ठिकाणी आपण उत्साहाने भेटलो होतो, त्याच ठिकाणी आता दिवसाच्या अनुभवांनी समृद्ध होऊन परत आलो होतो. एकमेकांचा निरोप घेताना अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान होते.
काहीजण फोटो पाहत होते. काहीजण दिवसभरातील प्रसंगांची चर्चा करत होते. काहीजण पुढच्या स्टडी टूरची योजना करत होते आणि मी मात्र मनातल्या मनात संपूर्ण दिवस पुन्हा एकदा जगत होतो.

हा प्रवास संपला; आठवणी मात्र नाहीत
टूरचा तो दिवस आता मागे राहिला आहे. पण त्या दिवसातील प्रत्येक क्षण अजूनही डोळ्यांसमोर उभा राहतो.
बोरिवलीच्या प्रवेशद्वारावरची सकाळ…
सहप्रवाशांची पहिली भेट…
बसच्या खिडकीतून दिसणारी हिरवाई…
आदिवासी पाड्याजवळ दिसलेली हरणे…
खळखळणारी नदी…
पाण्याने भरलेले धरण…
कान्हेरीची पहिली झलक…
भंडारे सरांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन…
प्राचीन शिल्पे…
दगडात कोरलेला इतिहास…
डोंगरावरून दिसणारी मुंबई…
स्वप्निल तांबे सरांचा चहा आणि गुलाबजाम…
सहप्रवासातील हास्य-विनोद…
घसरड्या वाटेवरील सावध पावले…
निर्वाणभूमीचा थरार…
आणि शेवटी परतीचा प्रवास…
सगळे काही मनाच्या कप्प्यात कायमचे साठून राहिले.

कान्हेरी म्हणजे काय?
कान्हेरी म्हणजे फक्त दगडात कोरलेल्या गुहा नाहीत.
कान्हेरी म्हणजे इतिहासाचा श्वास आहे.
कान्हेरी म्हणजे प्राचीन माणसाच्या कल्पकतेची साक्ष आहे.
कान्हेरी म्हणजे दगडात कोरलेली कला आहे.
कान्हेरी म्हणजे बौद्ध संस्कृतीचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे.
कान्हेरी म्हणजे निसर्गाच्या कुशीत उभे असलेले ज्ञानाचे विद्यापीठ आहे.
कान्हेरी म्हणजे हजारो वर्षांपूर्वीच्या कलाकारांच्या हातातील कौशल्याचा आरसा आहे.
कान्हेरी म्हणजे आपल्या भूतकाळाने वर्तमानाला दिलेली एक मौल्यवान भेट आहे.
आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात आपण भविष्य घडवण्याची स्वप्ने पाहत आहोत. पण भविष्य घडवताना भूतकाळ विसरता कामा नये.
कारण ज्या समाजाला आपला इतिहास माहीत असतो, तोच समाज आपल्या भविष्याची दिशा अधिक भक्कमपणे ठरवू शकतो. म्हणूनच कान्हेरीसारख्या ऐतिहासिक स्थळांना आपण केवळ एक दिवसाची सहल म्हणून पाहू नये. एकदा कान्हेरीला जा. पुन्हा जा. कुटुंबाला घेऊन जा. मित्रांना घेऊन जा. विद्यार्थ्यांना घेऊन जा. पण प्रत्येक वेळी तिथे जाताना एक गोष्ट नक्की घेऊन जा इतिहास समजून घेण्याची दृष्टी आणि इतिहास जपण्याची जबाबदारी. कारण “वारसा आपल्याला पूर्वजांकडून मिळतो; पण तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली असते.” आणि त्या दिवशी कान्हेरीच्या कुशीतून परतताना मनात एकच भावना होती
“प्रवास संपला…पण कान्हेरीच्या आठवणींचा प्रवास आता आयुष्यभर सुरू राहणार आहे.”

भूषण सहदेव तांबे
नवी मुंबई
९०२९२५८०३८

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular