Immediate help provided to farmers affected by tiger attack due to efforts of MP Pratibha Dhanorkar
चंद्रपूर : काळजावर घाव घालून गेलेल्या वाघाच्या हल्ल्याने ज्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले होते, त्या टेकाडी (ता. भद्रावती) येथील प्रत्येक बाधित कुटुंबाला आता खासदार प्रतिभाताई धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांच्या संवेदनशील पुढाकारामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. वाघाच्या हल्ल्यात आपले आधारस्तंभ बैल गमावलेल्या या शेतकरी बांधवांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्यात खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना यश आले आहे. विशेष म्हणजे, त्या पुढेही पाठपुरावा करून अधिक भरीव आर्थिक मदत मिळवणार आहेत. Immediate help provided to farmers affected by tiger attack due to efforts of MP Pratibha Dhanorkar
गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांनी थैमान घातले आहे, ज्यामुळे बळीराजाचे अतोनात नुकसान होत आहे. आपल्या जीवाभावाच्या जनावरांना गमावल्याने शेतकरी पार कोलमडून गेले आहेत. टेकाडी (ता. भद्रावती) येथील चार कुटुंबांवर तर दुःखाचा डोंगरच कोसळला होता, जेव्हा त्यांचे कष्टाचे साथीदार असे एकूण पाच बैल वाघाच्या हल्ल्यात ठार झाले. हातावर पोट असलेल्या या कुटुंबांसाठी ही केवळ जनावरांची हानी नव्हती, तर जगण्याचा आधारच हिरावला गेला होता. Tiger Attack
यामध्ये गणेश विठ्ठल गायकवाड यांना ५२००० रुपये मंजूर करण्यात आले, भाऊराव कवडू नन्नावरे यांना ४८७५० रुपये मंजूर करण्यात आले, रमेश आनंदराव श्रीरामे यांना ५२५०० रुपये मंजूर करण्यात आले आणि रवींद्र श्रीहरी अलाम यांना तात्काळ ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी भद्रावती पोलीस ठाण्याचे ठाणेदार लता वाढीवे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती.
या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता, या पीडित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. प्रशासनाकडे त्यांनी तळमळीने पाठपुरावा केला, शेतकऱ्यांचे दुःख आणि त्यांच्या डोळ्यातील आसवे शासनासमोर मांडली. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि प्रशासनाने संवेदनशीलता दाखवत, प्रत्येक बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर केली. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी देखील सहकार्य केले असून, पुढील मदतीकरिता त्वरित पाठपुरावा करून भरीव मदत करण्यात येणार आहे.
या मदतीमुळे या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना नक्कीच हातभार लागेल. खासदार प्रतिभाताई धानोरकर यावेळी भावूक होऊन म्हणाल्या, “शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. वाघांच्या हल्ल्यांमुळे त्यांची होणारी परवड पाहून मन हेलावते. या संकटाच्या काळात त्यांना तात्काळ आधार मिळणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.”
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या या तत्परतेमुळे आणि त्यांच्या माणुसकीच्या भूमिकेमुळे, टेकाडी येथील शेतकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.