Bhatali village rehabilitation process will gain momentum
चंद्रपूर :- भटाळी ओपन कास्ट माइन्समुळे भटाळी गावाला गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी घटल्याने पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खाणीत होणाऱ्या स्फोटांमुळे घरांना तडे गेले आहेत, तर शेती नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि स्थानिक समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासोबत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी भटाळी गावात पाहणी दौरा केला. गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्याचा निर्धार केला असून, यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिली.
भटाळी गावाच्या पुनर्वसनासंदर्भात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या समवेत पाहणी दौरा बुधवार (दि.02)केला. यावेळी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन)अतुल जटाळे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, पायली भटाळीचे सरपंच किसन उपरे, उपसरपंच विकास पेदांम, रामपाल सिंग, अनिता भोयर, सुरज पेदुलवार, राकेश गौरकार तसेच वेकोलीचे अधिकारी उपस्थित होते. Bhatali village rehabilitation process will gain momentum

आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, गाव पुनर्वसन समिती भटाळीच्या वतीने गावाच्या पुनर्वसनाबाबत नुकतीच बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीत पुनर्वसनाला होणारा उशीर लक्षात घेता, डब्लूसीएलकडून कोळसा उत्खनन सुरू असतानाच गावाला धोका निर्माण होत असल्याने पुनर्वसन तातडीने व्हावे, अशी मागणी भटाळीवासीयांकडून करण्यात आली. यासाठी आमदार श्री. मुनगंटीवार यांनी सदर पुनर्वसन प्रक्रिया गतीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.
पुनर्वसनाबाबत वेकोलीने सुचविलेली जागा गावकऱ्यांना मान्य नाही. यावर गावकऱ्यांसोबत बसून तोडगा काढण्यात येईल. पुनर्वसन स्थायी होण्याच्या दृष्टीने सर्वंकष अभ्यास करण्यात येईल. गाव पुनर्वसन समितीने गावाच्या पुनर्वसनाकरिता 13 मागण्या केल्या आहेत. येत्या आठ दिवसात या मागण्यांवर विस्तृत चर्चा करण्यात येईल. तसेच 13 मागण्यांचे विभाजन करून पुनर्वसन समिती समोर सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. “भटाळी गावाच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे तत्पर असून, लवकरात लवकर या प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील,” असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.