Women’s and Student Council resounded with the thunderous roar of women
चंद्रपूर :- “कहीं हम भूल नं जायें” या राष्ट्रीय अभियानाच्या अंतर्गत संविधान दिन (२६ नोव्हेंबर) आणि प्रजासत्ताक दिनाच्या (२६ जानेवारी) ७५ व्या वर्षानिमित्त सहावी महिला परिषद आणि चौथ्या विद्यार्थी परिषदचे भव्य आयोजन रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 ला स्नेहबंध सभागृह, उर्जानगर, चंद्रपूर येथे संपन्न झाले. Women’s and Student Council
या परिषदेला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या हजारो नागरिकांनी या भव्य परिषदांमध्ये सहभाग घेतला. आंबेडकरवादी चळवळीची मशाल सतत तेवत ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित या परिषदेमधे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून आलेल्या २४ महिलांनी मानवतावादी चळवळीप्रती कटिबद्ध होण्यासाठी ऊर्जावान भाषणांमधून प्रखर विचार मांडलेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित महिला वर्ग, विद्यार्थी वर्ग आणि कर्मचारी वर्ग विविध जिल्ह्यांमध्ये तयार होत आहे याबद्दल चहूबाजूने चर्चा सुरू आहे. महिला परिषदांमधून महिला कार्यकर्त्यांची फौज आणि विद्यार्थी परिषदांमधून आंबेडकरवादी विद्यार्थ्यांची फौज तयार होत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. अतुल पाटील, महिला परिषदेच्या मार्गदर्शक ॲड. अश्विनी मून आणि विद्यार्थी परिषदेचे मार्गदर्शक सुप्रीम कोर्टाचे ॲड. रितेश पाटील हे होते.
विषमतावादी व्यवस्थेला जर तोंड द्यायचे असेल तर मानवतावादी चळवळीच्या महिलांनी, विद्यार्थ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी यथाशक्ती चळवळीत सहभाग घेतला पाहिजे असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष ॲड. अतुल पाटील यांनी केले.
परिषदेचे संचालन माधवी बोरकर आणि एकता मेश्राम यांनी केले. परिषदेची प्रस्तावना शालिनी कांबळे यांनी मांडली. परिषदेचे आभार प्रदर्शन प्रियंका उंदीरवाडे यांनी केले.
प्रतिकूल परिस्थिती असतानाही ‘कहीं हम भूल नं जायें’ अभियान च्या कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र कठोर परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला, ज्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले.