Let’s celebrate festivals peacefully – District Collector’s appeal to the District Peace Committee
चंद्रपूर :- आगामी दोन – तीन दिवसांत जिल्ह्यात आषाढी एकादशी आणि मोहर्रम तसेच पुढील महिन्यांपासून गणेशोत्सव व इतर सणांना सुरवात होणार आहे. या दरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सर्वधर्मीय सण शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी केले.
नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, सहायक पोलिस अधिक्षक नियोमी साटम, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे उपस्थित होते.
प्रत्येकच नागरिक हा विना वर्दीतील पोलिस आहे, असे सांगून अपर जिल्हाधिकारी श्री. व्यवहारे म्हणाले, सर्वांनी आपापल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी. सोशल मिडीयावर येणा-या अफवांवर विश्वास ठेवू नये. मोहर्रम आणि एकादशी एकत्रित येत असून ग्रामीण स्तरावर जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधितांना योग्य निर्देश द्यावेत. मोकाट जनावरे, रस्त्यावरील खड्डे याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था, सा. बा. विभागाने विशेष देणे गरजेचे आहे. सण उत्सवाच्या कालावधीत वीज पुरवठा अखंडीत सुरू राहील, याची महाविरतण कंपनीने काळजी घ्यावी. या कालावधीत मद्यविक्रीचा साठा अचानक वाढणार नाही, यासाठी उत्पादन शुल्क विभागाने तपासणी करावी. प्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलिस विभागाने वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियेाजन करावे. तसेच आरोग्य विभागाने फिरते वैद्यकीय पथक, पुरेसा औषधीसाठी ठेवावा, अशा सुचना त्यांनी दिल्या.
अफवांबाबत सर्वांनी अलर्ट राहावे – अतिरिक्त पोलिस अधिक्षक कातकाडे
सोशल मिडीयाबाबत सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कृत्रिम बुध्दिमत्तेच्या माध्यमातून आजकाल बनावट पोस्ट करणे शक्य असून, असे आढळल्यास त्वरीत सायबर पोलिस स्टेशनसोबत संपर्क करावा. शांतता राखणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. सण आणि उत्सवादरम्यान पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येईल. ध्वनी प्रदुषणाबाबत डीजे ऑपरेटर्सची बैठक घेऊन मर्यादेचे पालन करण्याचे त्यांना सांगितले जाईल. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. चंद्रपूर जिल्ह्यातील आगामी सण उत्सव शांततेत पार पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले. तसेच शांतता समितीच्या उपस्थित सदस्यांनी सुचना केल्या. कार्यक्रमाचे संचालन मंगला घागी यांनी केले. बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, मुख्याधिकारी, पोलिस पाटील आदी उपस्थित होते.