Give justice to the locals, or face the consequences!” — MNS issues a 15-day ultimatum to KVR Company
चंद्रपूर :- वेकोली WCL चंद्रपूर क्षेत्रातील सिनाळा, मसाळा व नवेगाव या गावांतील प्रकल्पग्रस्तांना रोजगार न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने दिला आहे. मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी पत्रकार परिषद घेऊन वेकोली प्रशासनासह केवीआर कंपनी व्यवस्थापनाला थेट १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. Give justice to the locals, or face the consequences
सिनाळा, मसाळा व नवेगाव या तिन्ही गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी व घरे कोळसा खाण प्रकल्पासाठी अधिग्रहित करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, पुनर्वसनानंतरही स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील तरुणांना रोजगार न दिल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना तीव्र होत आहे. प्रकल्प उभारणीच्या वेळी स्थानिकांना रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात ते पाळले गेले नसल्याचा आरोप करण्यात आला.
दरम्यान, या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारांना संधी दिली जात असताना स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांना डावलले जात असल्याने परिसरात नाराजीचा सूर उमटत आहे. “ही प्रकल्पग्रस्तांची उघड फसवणूक असून स्थानिकांच्या हक्कावर गदा आणणारी बाब आहे,” असे अमन अंधेवार यांनी ठामपणे सांगितले. MNS issues a 15-day ultimatum to KVR Company
मनसेच्या वतीने वेकोली प्रशासन व कंपनी व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले असून, येत्या १५ दिवसांत रोजगाराबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास तिन्ही गावांतील प्रकल्पग्रस्तांना सोबत घेऊन “खळखट्याक” आंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन व कंपनीवर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, राज वर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते.