चंद्रपूर :- नशामुक्त समाज ही काळाची गरज असून, व्यसनाच्या विळख्यात अडकणार्या युवकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. नशामुक्तीची सुरुवात स्वतःपासून करून कुटुंब आणि समाजाला व्यसनमुक्त करण्याचा संकल्प केला पाहिजे. व्यसनामुळे केवळ व्यक्तीचेच नुकसान होत नाही, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे युवकांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे, असे प्रतिपादन MLA Kishor Jorgewar आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Everyone should take the initiative for a drug-free society
तुकुम येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत नागरिकांनी नशामुक्त समाजनिर्मितीची प्रतिज्ञा घेतली. यावेळी यावेळी डॉ. सचिन परब, कुंदा बेहन, नरेश, प्रेमकुमार, स्वेता सावलीकर, निरंजन उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आज व्यसनाधीनता ही गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. नशेच्या आहारी गेल्यामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बिकट होत आहे. विशेषतः युवा पिढीला या विळख्यातून दूर ठेवणे ही पालक, शिक्षक, सामाजिक संस्था आणि समाजातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. युवकांनी आपल्या ऊर्जेचा उपयोग शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि समाजोपयोगी कार्यासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, नशामुक्ती हा केवळ एका दिवसाचा संकल्प न राहता ती जीवनशैली बनली पाहिजे. एका व्यक्तीला व्यसनापासून दूर करण्यात यश आले तर त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. त्यामुळे नशामुक्तीची चळवळ घराघरापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले नशामुक्ती जनजागृतीचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून, अशा उपक्रमांना नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असेही सांगितले.
यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे पदाधिकारी, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी नशेपासून दूर राहण्याची तसेच समाजातील इतरांनाही व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करण्याची प्रतिज्ञा घेतली.
