Economic Upliftment of Women in the District through MAVIM Initiatives
चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या धोरणाला बळकटी देणारे महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) MAVIM हे एक महत्त्वाचे माध्यम ठरत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात माविमच्या माध्यमातून “जनतेचे धन जनतेच्या हाती” या संकल्पनेवर आधारित ११ लोकसंचालित साधन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. ही केंद्रे महिला बचत गटांच्या माध्यमातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत आहेत. Economic Upliftment of Women in the District through MAVIM Initiatives
नवतेजस्विनी प्रकल्प : माविमच्या महत्त्वाकांक्षी नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील ४०४ गावांमध्ये २,३२९ महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. या गटांमध्ये ३० हजारांहून अधिक महिलांचा समावेश असून, ३३ उपप्रकल्पांद्वारे ३,७५० महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कुक्कुटपालन, कृषी उपकरण बँक, बांबू उत्पादने, कार्पेट व अगरबत्ती निर्मिती यांसारख्या उद्योगांमुळे महिलांना उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध झाले आहेत.
तसेच, अतिगरीब महिलांसाठी चंद्रपूर, भद्रावती व कोरपना तालुक्यातील १,२४४ महिलांना सुमारे ७२.७५ लाख रुपयांचे कर्ज अल्प व्याजदरात देण्यात आले आहे.
मानव विकास मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या तेजश्री फायनान्शीअल सर्विसेस या उपक्रमाद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील ११,५२४ महिलांना सुमारे ४६८ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ५२५ महिला बचत गटांना एकूण २३६० लाख रुपयांचे बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच ६५ महिलांना सूक्ष्म उद्योगासाठी ३५ लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. या माध्यमातून महिला उद्योजकतेला चालना मिळत आहे.
नाविन्यपूर्ण प्रकल्पांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना :
माविमच्या पुढाकाराने जिल्ह्यात कार्पेट निर्मिती, बांबू हस्तकला, अगरबत्ती उत्पादन यांसारखे प्रकल्प यशस्वीरित्या सुरू आहेत. या प्रकल्पांमुळे शेकडो महिलांना रोजगार मिळाला असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल दिसून येत आहे. तसेच १५ तहसील स्तरावर सेतू सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली असून नागरिकांना विविध सेवा सुलभपणे उपलब्ध होत आहेत.
महिला सक्षमीकरणाचा प्रभावी आदर्श
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपक्रमांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांना केवळ आर्थिक आधारच नव्हे तर आत्मविश्वास, कौशल्य व सामाजिक प्रतिष्ठा मिळत आहे. स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला असून, त्या आज कुटुंबाच्या आर्थिक निर्णयांमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत.