Congress foiled opposition’s plan to win elections through bogus voting – Shantanu Dhote
चंद्रपूर :- राजुरा विधानसभा मतदारसंघात विरोधकांनी अज्ञात व्यक्तींना हाताशी धरून ऑनलाइन नोंदणीद्वारे ६ हजार ८५३ बनावट मतदारांची नावे समाविष्ट केल्याचे उघडकीस आले आहे. काँग्रेस पक्षाने याबाबत रितसर तक्रारी केल्या. शेवटी निवडणूक प्रशासनाने ही बोगस नावे रद्द करून पोलिसात तक्रार केली. या प्रकरणातील दोषींचा शोध घेऊन तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस विभागाला दिले आहेत.
त्यामुळे बोगस मतदानाद्वारे निवडणूक जिंकण्याचा विरोधांचा डाव काँग्रेसने उधळून लावला आहे अशी प्रतिक्रिया चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, यावरून राजुरा विधानसभेत लोकशाही व नैतिकतेला गालबोट लावण्याचा विरोधकांचे प्रयत्न दिसून येत आहेत. पून्हा एकदा काँग्रेस जिंकणार असल्याने विरोधक असे रडीचे डाव खेळत असल्याचे सिद्ध होते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी नंतर ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत केवळ ५ महिन्यात जवळपास ११ हजार नवमतदार वाढले आहेत. आणि आता आक्टोंबर महिन्यात ही ६८५३ अतिरिक्त बोगस मतदारांची नावे आढळून आली आहेत. निवडणूक आयोगाने तथा संबंधित यंत्रणांनी याबाबत खोलात जाऊन चौकशी केल्यास अनेक रहस्य आणि यामागचे सुत्रधार उघडकीस येण्याची शक्यता आहे. या सर्व अनैतिक कृत्यांमागे विरोधकांचाच हात आहे असा स्पष्ट आरोप त्यांनी केला आहे.
राजुरा विधानसभा मतदारसंघात आज पर्यत झालेल्या निवडणुकांमध्ये एक सभ्य, नैतिक निवडणूक प्रचाराची परंपरा राहिलेली आहे. मात्र यंदा काही राजकीय पक्ष नेतृत्व आणि कार्यकर्त्यांकडून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन मुद्दयांचे, विकासाचे राजकारण न करता वैयक्तिक चिखलफेक करून चर्चेत राहण्याचे पोरकट प्रयत्न दिसून येत आहेत. मतदारांचे, कार्यकर्त्यांचे धृवीकरण करून आप आपसात संघर्ष पेटविण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या निवडणूक आयोगाने व पत्रकारांनी जातीने लक्ष घालून असे गैरप्रकार उघडकीस आनावे व त्यावर वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी पावले उचलावीत असे आवाहन त्यांनी केले आहे.
तसेच पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले की विधानसभा निवडणुकीत युवक काँग्रेसची भूमिका महत्त्वाची राहणार असून वैयक्तिक चिखलफेक न करता मुद्द्यांचे राजकारण करण्याचा आमचा मानस आहे. महाराष्ट्रात जवळपास ५ ते ७ आमदारकीच्या टिकीट पक्षनेतृत्वाकडून मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
आयोजित पत्रपरिषदेत काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, जिल्हा महासचिव एजाज अहमद, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय लांडे, दिपक वाभिटकर, प्रा. प्रफुल्ल शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
