Divine Mahashivratri Celebrations in Chandrapur; Devotees throng to see ‘Mahakal Shrungar Mahadev
चंद्रपूर :- महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त लालपेठ माता नगर चौक येथे असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महाशिवलिंग स्थळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून दिव्य आणि अलौकिक धार्मिक वातावरण अनुभवायला मिळाले. उज्जेन महाकालेश्वर यांच्या धर्तीवर साकारण्यात आलेल्या ‘महाकाल श्रुंगार महादेव’ दर्शनासाठी हजारो भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने उपस्थिती लावली. Divine Mahashivratri Celebrations in Chandrapur
हर हर महादेव’च्या अखंड जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. आकर्षक फुलांची सजावट, दिव्य रोषणाई, धूप-दीप आणि वेदमंत्रांच्या निनादात भक्तांनी महादेवाचे दर्शन घेत आत्मिक समाधान अनुभवले. पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रुद्राभिषेक, महाआरती, महाकाल श्रुंगार दर्शन तसेच भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमांनी वातावरण पूर्णतः शिवमय झाले होते.
रात्री ठीक ११ वाजता शिव-पार्वती विवाह सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक धार्मिक विधींसह पार पडला. वेदमंत्रांच्या साक्षीने साजऱ्या करण्यात आलेल्या या दैवी विवाह सोहळ्याने भाविकांना भक्ती आणि आनंदाची अनोखी अनुभूती दिली. शिव-पार्वतीच्या मंगलाष्टकांनी आणि टाळ-मृदुंगाच्या निनादाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. उपस्थित भाविकांनी या सोहळ्याचा अनुभव घेतला.
या भव्य धार्मिक सोहळ्याची संपूर्ण व्यवस्था आमदार किशोरभाऊ जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भाविकांसाठी शिस्तबद्ध दर्शनरांग, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता आणि प्रकाशयोजना यांची विशेष काळजी घेण्यात आली होती.
यावेळी आमदार किशोरभाऊ जोरगेवार म्हणाले, महाशिवरात्री हा केवळ उत्सव नसून तो आत्मशुद्धी आणि श्रद्धेचा पवित्र सोहळा आहे.
मागील श्रावण महिन्यात आपण या जागृत आणि अतिप्राचीन शिवलिंग स्थळी भव्य कार्यक्रम आयोजित करून या पवित्र स्थळाची ओळख राज्यभर पोहोचवली. आज ‘महाकाल श्रुंगार’ दर्शनाच्या माध्यमातून चंद्रपूरच्या धार्मिक वैभवात आणखी भर पडली आहे. हे स्थान चंद्रपूरच्या आध्यात्मिक ओळखीचे प्रतीक आहे.
भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देत या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याचा आपला संकल्प आहे. भगवान महादेवाच्या कृपेने हा महोत्सव भक्तिभाव, शिस्त आणि उत्साहात पार पडत आहे, ही अत्यंत समाधानाची बाब असल्याचे ते म्हणाले.
महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या भक्तिमय सोहळ्याचा समारोप करण्यात आला.