*वर्धा-बल्लारशाह पॅसेंजर ट्रेनच्या वेळेत बदल मंजूर*
*विदर्भ अन् दुरंतोच्या प्रवाशांना मोठा दिलासा*
*खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पाठपुराव्याला यश*
चंद्रपूर : वर्धा-बल्लारशाह पॅसेंजर ट्रेनच्या वेळेत बदल करून प्रवाशांना कनेक्टिंग ट्रेन्स उपलब्ध करून देण्याची खासदार प्रतिभा धानोरकर यांची महत्त्वपूर्ण मागणी मध्य रेल्वे प्रशासनाने तात्काळ मंजूर केली आहे. नागपूर येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात आयोजित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वर्धा पॅसेंजरच्या वेळेत सुधारणा करण्याची आग्रही मागणी लावून धरली होती. या निर्णयामुळे विदर्भ एक्सप्रेस, दुरंतो एक्सप्रेसने आणि अमरावती अंजनी इंटरसिटी मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, नोकरदारांना व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या रास्त मागणीची तात्काळ दखल घेत मध्य रेल्वेच्या मुख्यालयाने गाडी क्रमांक ६११२७ वर्धा-बल्लारशाह ट्रेनचे नवीन वेळापत्रक जारी केले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता ही गाडी वर्धा जंक्शनवरून सकाळी ६:३० ऐवजी ७:३० वाजता सुटेल. ५ सप्टेंबर २०२६ पासून हे नवीन वेळापत्रक प्रत्यक्ष अंमलबजावणीत आले असून प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर झाला आहे.
नवीन वेळापत्रकानुसार ही गाडी हिंगणघाट येथे सकाळी ०८:१० वाजता, वरोरा येथे ०८:५१ वाजता, भांदक येथे ०९:१६ वाजता, चंद्रपूर येथे ०९:५२ वाजता पोहोचेल आणि अंतिम स्थानक बल्लारशाह येथे सकाळी ११:०५ वाजता दाखल होईल. या वेळेतील बदलामुळे नागपूर व मुंबईकडे जाणाऱ्या इतर गाड्यांशी जोडणी मिळणे सोपे झाले असून, गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांना होणारा मनस्ताप आणि वेळेचा अपव्यय आता टळणार आहे.
यासोबतच, बल्लारपूरवरून सायंकाळी ७ वाजता सुटणारी पॅसेंजर सायंकाळी ५ वाजता सोडण्यात यावी, जेणेकरून ती सायंकाळी ८ वाजता वर्धा येथे पोहोचेल. यामुळे वर्धा येथे सायंकाळी ८:३० वाजता येणाऱ्या दुरंतो एक्सप्रेसची जोडणी प्रवाशांना सहज उपलब्ध होईल, अशीही मागणी या वेळी मांडण्यात आली आहे.
नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाशी निगडित असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित निर्णय घेतल्याबद्दल खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मध्य रेल्वेच्या प्रशासनाचे आभार मानले आहेत. तसेच, चंद्रपूर-विदर्भ क्षेत्रातील इतर प्रलंबित रेल्वे प्रश्न, उड्डाणपूल व प्रवाशांच्या सोयी-सुविधांची कामे देखील वेगाने पूर्ण करून घेण्यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
