Thursday, July 23, 2026
HomeAccidentभाऊ, बातमी करू नको... नाहीतर तो तिसऱ्यांदा मरेल

भाऊ, बातमी करू नको… नाहीतर तो तिसऱ्यांदा मरेल

चंद्रपूर :-‘नीट’ पेपरफुटी हजारो कुटुंबांच्या स्वप्नांवर कोसळलेला आघात आहे. देशभरात तरुणांच्या मनात उसळणारा संताप आज जंतर-मंतरपासून गल्लीबोळापर्यंत दिसत आहे. पण या आंदोलनांच्या घोषणांमागे काही अशा वेदना आहेत, ज्या कधीच मथळे बनत नाहीत. NEET paper leak

अशीच एक कहाणी चंद्रपूरची. पत्रकार म्हणून ही घटना जगासमोर आणावी असे अनेकदा वाटले. पण एका आईच्या अश्रूंनी आणि तिच्या हात जोडून केलेल्या विनंतीने माझी लेखणी थांबवली.

तुकूम परिसरातील एका तरुणाने नीट परीक्षेत सुमारे ५३० गुण मिळवले होते. एखाद्या चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल, डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, या आशेने तो आणि त्याचे कुटुंब आनंदात होते. दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले होते. घरी आई, एक बहीण आणि तो. वडिलांच्या पेन्शनवर संसार सुरू होता. मुलगा डॉक्टर होईल आणि घरात पुन्हा आनंदाचे दिवस येतील, हा विश्वास त्या माऊलीला होता.
मात्र पेपरफुटीच्या वादळाने सर्व काही बदलून टाकले.

अनिश्चितता वाढली. परीक्षा पुढे ढकलली गेली. भविष्य धूसर झाले. त्या मुलाने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. अभ्यासाच्या नावाखाली तो एकटाच राहू लागला. मनात नेमके काय सुरू होते, याची कुणालाच कल्पना नव्हती.

एक दिवस तो बराच वेळ बाहेर आला नाही. आईने दार उघडून पाहिले आणि तिच्या तोंडून एकच आक्रोश बाहेर पडला. मुलाने विषारी पदार्थ सेवन केले होते. बाहेर जाण्याचीही हिंमत त्याच्यात उरली नव्हती. घरात असलेले झुरळ मारण्याचे साहित्य, फिनाईल, डेटॉल असे विषारी पदार्थ एकत्र करून त्याने जीव देण्याचा प्रयत्न केला होता. डॉक्टरांच्या प्रयत्नांनी त्याचा जीव वाचला. पण उपचार सुरू असतानाच पुनर्परीक्षा झाली आणि तो ती देऊ शकला नाही.

घरी परतल्यानंतर त्याने पुन्हा एकदा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा रुग्णालय. पुन्हा उपचार. पुन्हा मृत्यूशी झुंज. दुसऱ्यांदाही तो वाचला, पण अजूनही त्या धक्क्यातून पूर्णपणे सावरलेला नाही. आज त्या मुलावर आणि त्याच्या आईवर नागपूरमध्ये मानसोपचार सुरू आहेत. मुलाच्या वेदना पाहताना आई स्वतःही मानसिक आघातातून जात आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मी त्या माऊलीशी बोललो. तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या शब्दांत इतकी हतबलता होती की काही क्षण माझ्याकडेही बोलण्यासाठी शब्द नव्हते. ती म्हणाली, ‘आता आमच्या आयुष्यात काहीच उरलं नाही. नवरा दोन वर्षांपूर्वी गेला. मुलाने दोनदा जीव देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही बातमी करून काय करणार? बातमी केली तर तो तिसऱ्यांदा मरेल…’ असे म्हणत तिने फोन ठेवून दिला.

अशा कितीतरी वेदना आपल्या आजूबाजूला शांतपणे जगत आहेत. काही कहाण्या आपल्यापर्यंत पोहोचतात. काही कधीच समोर येत नाहीत. एका परीक्षेतील गोंधळाची किंमत हजारो कुटुंब मोजत आहे.

जंतर-मंतरवर दिसणारा संताप हे केवळ आंदोलन नाही. तो अशाच हजारो घरांमधून उठलेला आक्रोश आहे. काही जण रस्त्यावर उतरून व्यक्त होत आहेत, तर काहींचे दुःख अजूनही चार भिंतीआड अश्रूंमध्ये विरघळत आहे. त्या माऊलीची विनंती मानून ही कहाणी आजवर थांबवली होती. पण तिच्या वेदनेचा आवाज मात्र अजूनही कानात घुमतो आहे…

‘भाऊ, बातमी करू नको… नाहीतर तो तिसऱ्यांदा मरेल…’

प्रमोद काकडे,  सकाळ 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular