Minor Ranjit missing for five days; Family demands CID inquiry
चंद्रपूर :- बल्लारपूरचा १७ वर्षीय अल्पवयीन तरुण रणजित निषाद उर्फ कट्टाणी गेल्या ५ दिवसांपासून बेपत्ता असून, त्याचा शोध घेण्याची आणि प्रकरणाची CID सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी त्याच्या कुटुंबीयांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. Minor missing for five days
८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता रणजित आपल्या सात मित्रांसह राजुरा तहसीलमधील गोवरी – सास्ती परिसरातील कोळसा वॉशरी व वेकोली परिसरात फिरायला गेला होता. मात्र, तो परत आला नाही. दुसऱ्या दिवशी रणजितसोबत गेलेल्या तरुणांना चोरीच्या आरोपाखाली राजुरा पोलिसांनी अटक केली, मात्र रणजित त्यांच्यात नव्हता. त्याचा मोबाईल फोन मात्र दाऊद नावाच्या एका मुलाने पोलिसांना दिला असल्याची माहिती कुटुंबीयांनी पत्रपरिषदेत दिली.
रणजितचे पालक राजाराणी आणि दिनेश निषाद यांचा आरोप आहे की, राजुरा परिसरातील कोळसा वॉशरी आणि खाणींलगत रात्रीच्या वेळी बॅटरी व डिझेल चोरीच्या घटना घडत असतात. रणजितसोबत गेलेल्या तरुणांनीच त्याच्याशी काहीतरी अनुचित केले असावे, असा त्यांना संशय आहे. Family demands CID inquiry
या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिस प्रशासनाकडे तातडीने मुलाचा शोध घेण्याची किंवा सीआयडीमार्फत चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
पत्रकार परिषदेत रणजितची आई राजाराणी, वडील दिनेश निषाद, भाऊ संजय निषाद यांच्यासह मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे व इतर कुटुंबीय उपस्थित होते.