चंद्रपूर :- राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे प्रभावित झालेल्या राजुरा शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांसोबत राजुरा नगर परिषदेच्या सभागृहात महत्वपूर्ण बैठक पार पडली. महामार्ग विकासासोबतच स्थानिक नागरिक व बाधित शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करून त्यांच्या रास्त मागण्यांची तातडीने पूर्तता करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको…….
यावेळी बैठकीस खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, अरुणजी निमजे, NHAI चे प्रोजेक्ट डायरेक्टर प्रविण कुमार, ज्युनियर इंजिनिअर वाढी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक हरजीतसिंग संधु, बल्लारपूर काँग्रेसचे पापा आर्या, माजी नगराध्यक्ष रमेशजी नळे, नगरसेवक सिद्धार्थ पथाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष इंदूरवार, नगर परिषदेचे सर्व सभापती व नगरसेवक, NHAI चे अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या बैठकीत राजुरा – बामणी रस्त्यावरील प्रश्न, राजुरा शहरातील महामार्गालगत सुरू असलेल्या गट्टू कामांचा निकृष्ट दर्जा, स्पीडब्रेकरची समस्या, सर्व्हिस रोडची गुणवत्ता व अपूर्ण कामे, महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतजमिनी, नागरिकांना येणाऱ्या विविध अडचणी तसेच रस्ते व वाहतुकीशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर रेल्वे लाईनजवळील अंडरपास पूल, बसस्थानक परिसरातील समस्या आणि स्थानिक पातळीवरील इतर अनेक प्रश्नही अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आले.
महामार्गाच्या कामामुळे अनेक शेतकरी व नागरिकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्या तक्रारींकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून विकासकामे पूर्ण करतांना नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेत त्यावर आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश व सूचना खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तर बाधितांना योग्य न्याय मिळवून देणे, रस्ते व वाहतुकीच्या समस्या दूर करणे आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रभावी पाठपुरावा करण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
