Students Extend a Helping Hand of Humanity Amidst Chandrapur’s Scorching Heat
चंद्रपूर :- चंद्रपूरच्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उन्हात राबणाऱ्या कामगारांना दिलासा देण्यासाठी राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग Rajiv Gandhi College of Engineering, Research and Technology (RCERT) च्या विद्युत अभियांत्रिकी विभागाने सामाजिक बांधिलकी जपत कौतुकास्पद उपक्रम राबविला. बंगाली कॅम्प कामगार चौक येथे कष्टकरी कामगारांना थंड पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करून विद्यार्थ्यांनी मानवतेचा प्रेरणादायी संदेश दिला.
सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचलित महाविद्यालयातील विद्युत विभागाच्या वतीने आयोजित या उपक्रमात उष्णतेने त्रस्त कामगारांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून उन्हात काम करणाऱ्या मजुरांना त्याचा मोठा फटका बसत आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी सेवाभावी भावनेतून हा उपक्रम हाती घेतला.
EETA बॉडी इन्चार्ज प्रा. सुयोग संघरत्न ढोके तसेच प्रा. दीपाली आर. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ५८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सकाळच्या वेळेत कामगार चौक परिसरात मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या कामगारांना विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन थंड पिण्याचे पाणी वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांनी कामगारांशी संवाद साधत उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी नियमित पाणी पिण्याचे महत्त्वही पटवून दिले.
अचानक मिळालेल्या या मदतीमुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेक कामगारांनी विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानत त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले. परिसरातील नागरिकांनीदेखील विद्यार्थ्यांच्या या सामाजिक जाणीवेचे स्वागत केले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे तसेच विद्युत विभाग प्रमुख डॉ. आर. के. धात्रक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्रा. सुयोग संघरत्न ढोके व प्रा. दीपाली आर. वैद्य यांनी विद्यार्थ्यांना समाजातील गरजू घटकांसाठी नेहमी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
मानवता, सामाजिक बांधिलकी आणि समाजाप्रती संवेदनशीलता जपणारा विद्युत विभागाचा हा उपक्रम सध्या सर्व स्तरांतून कौतुकाचा विषय ठरत आहे.
