Tadoba is a Boon of Nature; We Will Transform Agarzari and Moharli into ‘Model Villages’ for Ecology
चंद्रपूर :- राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी, ‘ताडोबा हे निसर्गाचे वरदान असून आगरझरी-मोहर्लीला पर्यावरणीय ‘मॉडेल व्हिलेज’ म्हणून विकसित करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पद्मापूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पद्मापूर प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाचे अधिकृत उद्घाटन आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ताडोबा पर्यटन विकास, रस्ते, सौंदर्यीकरण आणि स्थानिकांना रोजगारनिर्मिती यावर भर देत ताडोबाला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून अधिक भक्कम स्थान मिळवून देण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. Tadoba is a Boon of Nature; We Will Transform Agarzari and Moharli into ‘Model Villages’ for Ecology
कार्यक्रमाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला, उपसंचालक कुशाग्र पाठक, उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, उपकार्यकारी अभियंता विवेक अंबुले, शहर उपाध्यक्ष रामपाल सिंग, माजी जि. प. सदस्य गौतम निमगडे, माजी सभापती रोशनी खान, सुरेखा थोरात, अजय सरकार, मनोज सिंघवी, श्रीनिवास जंगम, मोहर्ली सरपंच सुनीता कातकर, चोरगाव सरपंच तृणाली धंदरे, अनिता भोयर, चंद्रकांत ढोडरे, शुभम गेडाम आदींची उपस्थिती होती.
पद्मापूर प्रवेशद्वाराचे काम तसेच ताडोबाला जाणाऱ्या रस्त्याचे काम अत्यंत उत्कृष्ट, दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आले. कमी खर्चात दर्जेदार काम पूर्ण करून ताडोबाच्या पर्यटन वैभवात भर घालणाऱ्या संबंधित कंत्राटदारांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष कौतुक करत अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, अशा गुणवत्तापूर्ण कामांमुळे ताडोबाची ओळख अधिक भव्य आणि आकर्षक बनत आहे.
आगरझरी गावात रस्त्याच्या बाजूचे सौंदर्यीकरण करण्यासाठी १ कोटी ८५ लाख ६२ हजार ८४७ रुपयांचे काम करण्यात आले. यामुळे जंगलातून प्रवास करताना पर्यटकांना झाडांवरील बिबट्या, विविध पक्षी, फुलपाखरे आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येणार आहे. आगरझरी गावाचे नाव देशभरातील पर्यटकांच्या ओठांवर राहील, अशा दर्जेदार पद्धतीने हे काम करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी श्री. विप्लोवराज सिंघवी यांचेही अभिनंदन करण्यात आले.
ताडोबा ही निसर्गाची मोठी देणगी असून, वनमंत्री असताना या भागाचा विकास व्हावा यासाठी जीव ओतून काम केले, असे सांगताना आमदार मुनगंटीवार म्हणाले की, ताडोबा हे पर्यटन क्षेत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे यासाठी ताडोबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूरच्या ताडोबा उत्सवामध्ये सहा विश्वसुंदरी सहभागी झाल्या आणि त्यामुळे ताडोबाची ओळख जागतिक स्तरावर पोहोचली. New Momentum to Tadoba Tourism Development
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ सुमारे १७२५ चौरस किलोमीटर असून, संजय गांधी नॅशनल पार्कचे क्षेत्रफळ १०४ चौरस किलोमीटर आहे. नवीन ताडोबा विकसित करायचा असेल, तर महाराष्ट्राचे २३ वर्षांचे संपूर्ण बजेट खर्च करावे लागेल. त्यामुळे ताडोबा ही आपल्याला निसर्गाने दिलेली अमूल्य संपत्ती आहे. २०१४ नंतर येथे मोहर्ली गेट, गावांतील अंतर्गत रस्ते, बटरफ्लाय गार्डन यांसारखे अनेक विकास प्रकल्प राबविण्यात आले, याचाही आ. मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.
आगरझरी आणि मोहर्ली ही दोन्ही गावे पर्यटकांच्या कायम स्मरणात राहतील. पुढील पाच वर्षांत ही गावे उत्कृष्ट पर्यावरणीय मॉडेल व्हिलेज म्हणून विकसित करण्यात येतील. याचा अभिमान गावकऱ्यांना तसेच देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांनाही वाटेल, असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
पर्यावरण आणि पर्यटन हे वरदान ठरावे, या दृष्टीने कामे करण्यात आली. आज अनेकांच्या हाताला रोजगार मिळण्यामागे वाघ आणि ताडोबा हे प्रमुख कारण आहे. रिसॉर्ट, हॉटेल, जिप्सी आणि गाईड या क्षेत्रांमध्येही अधिक संधी निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन तसेच केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्र्यांना ताडोबाचा ५० आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांमध्ये समावेश करण्याची विनंती करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. जगातील सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आढळतात. वाघ हा पराक्रमाचे प्रतीक असून, ‘वाघांच्या जिल्ह्याचा’ आवाज कुठेही कमी पडू दिला जाणार नाही; विधानसभेतही ही गर्जना कायम राहील, असे आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
या विभागातील लोकांना न्याय देणे ही आमची जबाबदारी आहे. वाघांचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या लोकांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, आदिवासी समाजातील बांधव-भगिनींना, अनुसूचित जाती, ओबीसी तसेच विशेषतः नारीशक्तीला कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
आगरझरीवासीयांनी प्रेमाने आणि उत्साहाने केलेल्या स्वागताबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आदिवासी नृत्य सादर करणाऱ्या तरुण-तरुणींमध्ये प्रचंड ऊर्जा जाणवल्याचे सांगत, देशातील कोणताही व्याघ्र पर्यटक ताडोबामध्ये येईल तेव्हा तो येथील आनंदासह अविस्मरणीय आठवणी घेऊन जाईल, असा विश्वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
ताडोबासाठी आणखी उत्तम नियोजन तयार करण्यात येणार असून, पर्यटकांच्या सोयी-सुविधांसोबतच या वनक्षेत्राचे संवर्धन करणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या सुविधाही वाढविण्यात येतील. ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि सर्व लोकप्रतिनिधींसोबत कार्यशाळा घेऊन पुढील विकास आराखडा तयार केला जाईल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ताडोबा हे स्मार्ट आणि सुंदर पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने तीन महत्त्वाच्या उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.