Reaction: budget leading to a developed India – Dr. Ashok Jivatode
चंद्रपूर :- अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये देशातील विविध क्षेत्राकरीता अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. हा अर्थसंकल्प भारताला विकसित करणारा अर्थसंकल्प आहे, असे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.
या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राकरीता १,१२,८९८ कोटी, नवीन वैद्यकीय महाविद्यालय, मिशन इंद्रधनुष्य योजना, ७ नव्या आयआयटी व ७ नव्या आयआयएम ची स्थापना, महिलांकरीता निःशुल्क सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण, १ कोटी घरांना सौर उपकरणांचे वितरण, १ कोटी गरीबांना ३०० युनिट पर्यंत मोफत वीज, लोकसंख्या नियंत्रण समिती स्थापन करणार, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकरीता योजना, गरिबांसाठी २ कोटी घरे, तीन कोटी महिलांना लखपती दीदी योजना, आशा वर्कर्सला आयुष्यमान योजनेचा लाभ, रेल्वे प्रवास सुखकर, ई-व्हेहिकल इकोसिस्टीम वाढविणार, कृषी क्षेत्रात पीपीपी मॉडेल आणणार, आदी अनेक सुधारणा या अर्थ संकल्पात दिसत आहे.
‘जय अनुसंधान’ हा नारा भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकेल असा विश्वास आहे. नारीशक्ती, अन्नदाता शेतकरी, गरीब कल्याण, विकसित भारत, सर्वांगीण विकास साधणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प तसेच महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा मजबूत करणारा व युवकांना उद्यमशीलतेला – स्टार्टअप इनोवेशनला बळ देणारा ‘रोजगारदाता’ अर्थसंकल्प आहे, असेही डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.
सहाव्यांदा बजेट मांडणाऱ्या अर्थमंत्री मा. निर्मला सीतारामन यांचे या निमित्ताने डॉ. जीवतोडे यांच्या तर्फे अभिनंदन देखील करण्यात आले आहे.